बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की, पोलिसांना वाल्मीक कराड कुठे होता हे कळले नाही. वाल्मीक कराड प्रकरणात सरकारवर दबाव असल्याचे दिसते, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड अखेर शरण आला आहे. खंडणीच्या प्रकरणात पोलिसांसह सीआयडीचे पथक त्याचा मागोवा घेत होते, मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता. दोन दिवसांपासून त्याच्या शरण येण्याच्या चर्चांना वेग आला आणि सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर वाल्मीक कराड पुण्यात दाखल झाला. मंगळवारी सकाळी सव्वाबारा वाजता तो सीआयडी मुख्यालयात शरण गेला. तीन तासांच्या चौकशीनंतर, सीआयडी पथकाने वाल्मीक कराडला केजकडे रवाना केले.
केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे, त्यानंतर त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना सूचित केले की, सरकारवर दबाव आहे, परंतु त्यांनी त्याला बळी पडू नये. प्रकाश आंबेडकर हे पुण्यातील कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही, याचे मला आश्चर्य वाटत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी याप्रकरणात सरकारवर दबाव असल्याचे सूचित करत, तपास यंत्रणांनी त्यांचे अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये, अशी विनंती केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना दबावाला बळी पडू नये, अशीही आग्रही विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दिलेल्या प्रतिक्रिया मध्ये म्हटले की, “कोण काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही, आम्ही पुराव्यांवर आधारित कारवाई करणार आहोत. जिथे पुरावा आहे, तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही पुरावे गोळा करतच आहोत आणि आणखी कोणाकडे पुरावा असेल तर तो देण्याचे आवाहन करतो. हत्या करणाऱ्या मुख्य दोषीला शिक्षा झाली पाहिजे, हेच महत्त्वाचे आहे.”