Posted in

“संतोष देशमुख हत्येवर सुरेश धस यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, व्हिडीओ कॉलने उलगडल मोठ रहस्य!”

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून बीड जिल्ह्यात राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही नाव का घेत नाही, तुमच्यावर दबाव आहे का?” असा प्रश्न सुरेश धस यांना विचारल्यानंतर, त्यांनी उत्तर दिलं की, “मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहेत आणि विष्णू चाटेच आदेश देत होता. आकाशी बोलत असताना त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, आणि मला शंभर टक्के खात्री आहे.”

“मी कधीच कुणाला घाबरलो नाही. माझं स्टेटमेंटच झालं आहे. भीती, दहशत आणि आकाला मी घाबरत नाही. तपास होईल, मोठ्या आकांचं नाव आलं, तर मी ते घेईन. हे सर्व परळीपर्यंतच घडत होतं, पण आता कार्यक्षेत्र केजपर्यंत आणि बीडपर्यंत वाढवलं. खंडणी आणि अपहरणाचं कार्यक्षेत्र त्यांनी विस्तारलं. त्यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं आणि लीज करार करून काम चालवलं. त्यामुळे हे सर्व घडत गेलं.”असे आरोप सुरेश धस यांनी केले.

सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवर गंभीर आरोप करत सांगितले, “आता हे टोकाला पोहोचले आहे. 99 अपराधांनी शिशुपालाचा परमोच्च बिंदू गाठला होता आणि श्रीकृष्णाने त्याला मारलं. देशमुख यांच्या हत्येमुळे ते 100 झाले. कित्येकांना मारलं, किशोर फड आणि गर्जे यांसारखी अनेक नावे आहेत, पण एकाच वेळी सर्व नावे घेता येत नाहीत. आता जर काही बोललं नाही तर केजपासून आष्टीपर्यंत हे उद्योग वाढतील. वकील आणि साक्षीदारही त्यांचेच असतील. हे सर्व खूप वाढलं आहे.” फडणवीस यांच्या संदर्भात ते म्हणाले, “फडणवीस जोर लावत आहेत आणि आम्ही अपेक्षाही करतो की आका लवकर पकडले जावेत. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, पण आमचे साहेब त्यांना माफ करणार नाहीत. फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी ठरवणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच आका ताब्यात यावा ही मागणी आहे.”