परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची काल समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ आज परभणी बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागल्याने जाळपोळीच्या घटना घडल्या. घटनेनंतर रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी आंबेडकरी अनुयायांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी परभणी शहरातील तणाव शांत करण्याची विनंती केली असून, त्यांनी आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आठवले यांनी सांगितले की, कोणी माथेफिरूने संविधान आणि बाबासाहेब यांचा अपमान केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे, पण त्याच्या मागे कोण आहे याची चौकशी व्हावी. आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिल्लीत बोलणार आहे.
“हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे, आणि अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रियांचे स्वागत करणे अपेक्षित आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना अनेक दिवसांनी घडली आहे. बाबासाहेब यांचे पुतळे देशभर अनेक ठिकाणी उभारले गेले आहेत आणि त्यात मराठा समाजाचा देखील मोठा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये. ज्याचाही या प्रकारात हात असेल, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली जाईल आणि चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.”असे रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्या घरी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीत ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकींवर चर्चा झाली. “निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या आहेत. ईव्हीएम ही काँग्रेस सरकारच्या काळात आणली होती. तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या की ईव्हीएम चांगली दिसते, पण जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा त्यावर आक्षेप घेतला जातो. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत, त्यांना आपला पराभव स्वीकारावा लागेल. आम्ही ईव्हीएमवर विश्वास ठेवतो. जर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेतली तर मतमोजणीला किती वेळ लागेल, याची कल्पनाही आपल्याला आहे, अस आठवले यांनी सांगितले.